नवविधा भक्ती ------- ३-नामस्मरण,
तिसरी भक्ती नामस्मरण. महाराष्ट्रीय संतांनी ह्या भक्ती प्रकाराला सर्वात ज्यास्त महत्व दिले आहे. त्याला कारणही तसेच आहे. प्रथम आपण ऐकतो मग ऐकलेले लोकांना सांगतो आणि मग ---- "सहजच" ---- त्याचा ध्यास घेतो, धावा करतो, सतत स्मरण करतो, त्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. सहज निदिद्ध्यास हेच प्रेमाचे लक्षण आहे. हे प्रेम ईश्वरावर करतो तीच भक्ती. ह्यात बेचैनी, विरह वेदना, प्रत्यक्ष भेटीची आस, कडाडून भेटण्याची इच्छा हे सर्व भाव अंतरभूत आहेत. श्रावण भक्ती साठी सांगणारा किंवा लिहिणारा तरी लागतो. कीर्तन भक्ती साठी कोणीतरी ऐकणारा लागतो. नामस्मरणाला दुसरा कोणी लागत नाही. माझे नाम मी माझ्या मनात घेतो इथे दुसरा कोणी लागत नाही. नामाला स्थळ, कळ, वेळ, देश, धर्म, जात, लिंग, शौच अशौच कशाचेही बंधन नाही. त्यामुळे भक्ताची मनाची तयारी असल्यास नाम अखंड चालू राहू शकते. हे नामाचे महत्व आहे. ह्यालाच अनुसंधान म्हणतात आणि नामाचे हे अखंडत्व राहणे फक्त नामस्मरण भक्तीत शक्य आहे. प्रीयातामचे/ईश्वराचे नाम घेण्यासाठी कधी सांगावे लागत नाही. हे सर्व वास्तव विचारात घेता भक्तीचा सर्वात प्रभावी, सहज साद्ध्य, सोपा, सर्व प्रकरच्या माणसांना पेलणारा प्रकार आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून हा भक्ती प्रकार आपल्या समाजात विशेष प्रचलित झाला. त्यामुळे नवविधा भक्तीच्या मद्ध्ये हा मुकुट आहे / तुरा आहे.
No comments:
Post a Comment